कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर शहरातील श्री अंबाबाई देवीच्या देवस्थानासह पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे तीन हजार ६७ मंदिरांचे व्यवस्थापन १९६९पासून महाराष्ट्र शासनाची ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ पाहते. या देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी आणि भगिनी मंचाच्या अध्यक्षा वैशाली राजेश क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल सर्वच स्तरांतून वैशाली क्षीरसागर यांना शुभेछा दिल्या जात आहेत. या नियुक्तीबद्दल शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
वैशाली राजेश क्षीरसागर या गेली आठ-नऊ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना समाजकार्याचे बाळकडू त्यांचे वडील बापूसाहेब मोहिते यांच्याकडून मिळाले. पाच वेळा कोल्हापूर महानगरपालिकेचे सदस्य असलेल्या बापूसाहेब मोहिते यांची शहर विकासासाठीची धडपड वैशाली राजेश क्षीरसागर यांनी जवळून अनुभवली आहे. यानंतर शहराचे लोकप्रिय आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी विवाहानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रत्येक आंदोलनात्मक, सामाजिक आणि राजकीय कार्यात वैशाली राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन साथ दिली आहे.
करवीर नगरीतील महिला बचत गटांना बळकटी मिळावी, महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा, महिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धा-परीक्षांमधून पुढे याव्यात, तसेच व्यवसायनिर्मिती करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे यासह अनेक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून क्षीरसागर यांनी २०११मध्ये भगिनी मंच या महिला संघटनेची स्थापना केली. या भगिनी मंचाद्वारे सलग तीन दिवसांचा ‘भगिनी महोत्सव’ आयोजित केला जातो. विविध स्पर्धा, भगिनी पुरस्कार असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचबरोबर महिलांना कायमस्वरूपी रोजगारनिर्मिती होण्याच्या दृष्टीने गारमेंट पार्क निर्मितीची योजना अंमलात आणली आहे. यासह भगिनी मंचाद्वारे दर वर्षी नवदुर्गा सहल, रक्तदान शिबिर, रक्षाबंधनादिवशी सीमेवर लढणाऱ्या सैनिक बांधवांना राखी पाठवणे, स्वच्छता मोहीम, महिला आरोग्य शिबिर आदींचे आयोजन करून सामाजिक भान जपले जाते.
शिवसेनेच्या वतीने शिवसेना शहर कार्यालय शनिवार पेठ येथे या नवनियुक्तीबद्दल वैशाली क्षीरसागर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना महिला आघाडी आणि भगिनी मंचच्या वतीने महिलांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या वेळी त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने कोषाध्यक्षपदी झालेली निवड श्री अंबाबाईची निःस्वार्थी सेवा करून, पारदर्शी कारभाराद्वारे देवस्थान समितिचा कारभार स्वच्छ ठेवून सार्थकी लावणार असल्याचे त्या या वेळी म्हणाल्या.
या वेळी परिवहन सभापती नियाज खान, नगरसेवक अभिजित चव्हाण, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, माजी उपमहापौर उदय पवार, ज्येष्ठ सिने कलाकार भालचंद्र कुलकर्णी, दीपक गौड, संजय गांधी समिती अध्यक्ष किशोर घाटगे, महिला आघाडी शहरप्रमुख मंगल साळोखे, माजी शहरप्रमुख पूजा भोर, मंगल कुलकर्णी, गौरी माळदकर, शाहीन काझी, पूजा कामते, गीता भंडारी, रुपाली कवाळे, सोनाली पेडणेकर, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, सुनील जाधव, विशाल देवकुळे, रमेश खाडे, सुजित देशपांडे, पद्माकर कापसे, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, अमित चव्हाण, अनिल पाटील, अजित गायकवाड, सुनील खोत, सनी अतिग्रे, गजानन भुर्के, उमेश जाधव, राजू काझी, सुरेश कदम, नीलेश गायकवाड, सुनील भोसले, भाई जाधव, फेरीवालेसेना शहरप्रमुख धनाजी दळवी, युवासेना शहरप्रमुख अविनाश कामते, पीयूष चव्हाण, चेतन शिंदे, माथाडी कामगार सेना शहरप्रमुख राज जाधव, उदय भोसले, सागर घोरपडे, सुनील भोळे, सुनील करंबे, राज अर्जुनिकर, राज कापसे आदी मान्यवर शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, छ. ताराराणी गारमेंट पार्क महिला कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.